कासारवाडीत काँग्रेसकडून केंद्राचा निषेध

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शेतकरी विरोधी आणि कामगारांविरोधी काळे कायदे संमत केले. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी निदर्शने करत आंदोलन पुकारले होते.
या पार्श्वभूमीवर कासारवाडी येथील नाशिकफाटा चौकात आंदोलन केले. ‘शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.
कासारवाडी येथील आंदोलनात ज्येष्ठ कामगारनेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अनिल रोहम, मनोहर गाडेकर, वसंत पवार, सुनिल देसाई, शशिकांत धुमाळ, हमीद इनामदार, गणेश दराडे, कुमार मारणे, किशोर घडीयार, सुभाष मुळे, डॉ. संजय नेवसे, ज्ञानेश्वर चेरीयाल, महेश मंडलिक, अशोक साळवे, राजू खामकर, किरण भुजबळ, संतोष खेडकर आदींसह या आंदोलनात इंटक, आयटक, सिटू, टीयुसीसी, हिंद कामगार संघटना, ग्रीव्हज कॉटन अलाईड कंपनीच एम्पॉईज युनियन, पूना एम्प्लॉईज युनियन (आयटक), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑल इंडिया डीफेन्स फेडरेशन, संरक्षण, पोस्ट, कात्रज दूध उत्पादक संघ कामगार संघटना इंटक, बँक कर्मचारी संघ इंटक या संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
कैलास कदम म्हणाले, ‘एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी – शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे. बौध्दिक मवाली लोक सोशल मिडीयात वाटेल ते खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं? असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे, हे काँग्रेसनेच उभे केले आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे. हे सरकार गोरगरीबांचे, शेतकरी – कामगारांचे नसून भांडवलदारांचे आहे.