सैफवरील चाकू हल्ला रिक्रिएट होणार?

आरोपीकडून संपूर्ण हल्ला प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांचे पुढचे पाऊल
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, (वृत्तसंस्था) : अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी घडलेला चाकू हल्ल्याचा प्रसंग पोलिसांकडून रिक्रिएट केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं दिली आहे.
या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपी हा ३० वर्षीय बांग्लादेशी तरूण सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. ठाण्यात कासारवडवली येथून रविवारी याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शरीफुल फकीर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कपडे बदलत, केसांची स्टाइल वेगळी करत पोलिसांना गुंगारा देऊन कासारवडवली इथं खारफुटीच्या दलदलीत लपून बसलेला शरीफुल याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. शरीफुल असे नाव असताना तो विजय दास असे नाव बदलून वावरू लागला होता. ओळख लपविण्यासाठी त्याने अनेक शकला लढविल्या होत्या. भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणू करून त्याला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीला १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी पोलिसांची मागणी होती मात्र, कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
शरीफुल याने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू कुठे लपवून ठेवला आहे हे विचारून तो त्याच्याकडून हस्तगत करण्याचे महत्त्वाचे काम पोलिसांना करायचे आहे. कारण, याच चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतून शस्त्रक्रिया करून काढावा लागला होता. शरीफुल हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे समोर येत आहे. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे भारतीय ओळखपत्र नाही. तो बांग्लादेशातून घुसखोरी करून भारतात कधी दाखल झाला, सैफवर हल्ला करण्यासाठी त्याला कोणी चिथावले होते, त्याने सैफ अली खान याच्याच घराची निवड का केली, कडक सुरक्षा असताना त्याला घरात प्रवेश कसा मिळाला, अशा अनेक प्रश्नांची उकल पोलिसांना करून घ्यायची आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून चाकू हल्ल्याचा प्रसंग सैफच्या घरात पुन्हा एकदा आरोपीला नेऊन घडविला जाऊ शकतो, अर्थात रिक्रिएट केला जाऊ शकतो, असे वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.
(संदर्भ – पीटीआय)