फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

कबूतर महत्त्वाचं का माणसाचा जीव?

कबूतर महत्त्वाचं का माणसाचा जीव?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : कबूतरांना खायला दिले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पुणे महानगरपालिकेने दिला असताना राज्यभरात सगळीकडेच याची अंमलबजावणी झाली पाहिजे, इतका हा गंभीर विषय आहे. मुंबईतल्या कबूतरखान्यांखेरीज अनेक उपनगरांमध्ये रस्तोरस्ती कबूतरांना खायला देणाऱ्या जागा अनधिकृतपणे तयार झाल्या आहेत. कबूतरांमुळे माणसाच्या आरोग्याला धोका आहे, हे माहीत असूनही भूतदया माणसाच्या जीवापेक्षा मोठी झाली आहे का?

कबूतरांना खायला घातले असता, घरात समृद्धी येते, या भावनेतून शहरांमध्ये विविध रस्त्यांवर, कोपऱ्यांवर फुटाण्यांपासून फरसाणपर्यंत अनेक प्रकार कबूतरांना खाण्यासाठी दिले जातात. प्रत्येकच शहरात अशा प्रकारे कबूतरांचे थवेच्या थवे अलिकडे दिसत आहेत. किडे, कीटक किंवा धान्याचे दाणे असे अन्न असलेली कबूतर ही जमात आता फरसाण, शेव, फुटाणे यावर मजेत गुजराण करते आहे. कबूतरांना खायला घालायला येणारी माणसं चक्क अर्धा अर्धा किलो फुटाणे आणि फरसाणाच्या पिशव्या आणून रस्त्यांवर कबूतरांच्या थव्यासमोर ओतून देतात. मग असाच एखादा भूतदया दाखवून कोणीतरी तिथे सिमेंटचा गोलाकार आकार करतो आणि त्यात कबूतरांसाठी पाणी टाकतो. आता या कबूतरांचं बस्तान तिथून काही केल्या हलत नाही. दिवसागणिक अनेक लोक मनातल्या भूतदयेच्या भावनांमुळे किलोकिलो अन्न कबूतरांपुढे टाकून निघून जातात. या सगळ्याचा परिणाम त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो, याचा कोणी विचारच करत नाही.

आपल्या सभोवताली जशी सिमेंटची जंगले वाढत गेली, तशी चिमण्यांची संख्या कमी झालेली आपल्या लक्षात आलीच असेल. चिमणी या पक्ष्याला नैसर्गिक अधिवास, माती, दगड लागतात. झाडाच्या काड्यांनी ती घराच्या खोबणीत, माळ्यावर वगैरे घरटं करीत असे. मातीत अंग स्वच्छ करून आंघोळ करत असे. त्यामुळे चिमणी हा स्वच्छ पक्षी समजला जातो. मात्र कबूतर या पक्षाकडे मुळातच स्वच्छता हा प्रकार नाही. परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेणारा हा पक्षी मानला जातो. म्हणजेच, सिमेंटची जंगले झाली तरीही इमारतींच्या एखाद्या कोपऱ्यात कबूतराचे घरटे करून तो राहू शकतो.

कबूतरांमुळे माणसांना काय होतो आजार?
कबूतरांच्या पिसांमधून आणि विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंचा माणसाला जर संसर्ग झाला तर श्वसनासंबंधीचे आजार बळावू शकतात. कबूतरांची लहान पिसे वाऱ्याबरोबर आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहेत, हे आता आपल्या लक्षात आलंही असेल. मात्र, आपण त्याकडे तितक्या गांभीर्याने अद्याप पाहिलेले नाही. पिसं आणि विष्ठेवर चढलेली बुरशी माणसांसाठी खूप अपायकारक आहे. वाऱ्याबरोबर यातले जंतू आपल्या श्वसनमार्गातून कसे सहज जात आहेत, याचा आपण कधीच विचार केलेला नाही. तुम्ही जर गच्ची, बाल्कनी, टेरेस अशा ठिकाणी कपडे वाळत घातले आणि ते घातले तर संवेदनशील त्वचा असलेल्यांच्या अंगाला खाज येण्याची तक्रार नक्कीच ऐकली असेल.

पक्ष्यांना खाऊ घालणं गुन्हा?
कबूतरच काय तर कोणत्याही मुक्या प्राण्याला खाऊ घालणं हा गुन्हा मानलेला आहे. एखाद्या सोसायटीत अचानक कधीतरी एखादं माकड किंवा वानर येतं आणि धुमाकूळ घालतं. पण लोक त्याचा आनंद घेतात. त्याला केळ भरवतानाचा सेल्फी काढण्यापासून अनेक पदार्थांचा पाहुणचार करतात आणि आनंद घेतात. मात्र, असे प्राणी मानवी वस्तीत आल्यास सगळ्याच महत्त्वाची गोष्ट करावी, ती म्हणजे त्यांना कोणतंही अन्न देऊ नये. म्हणजे हे प्राणी आपोआप निसर्गाच्या अधिवासात अर्थात त्यांच्या घरी निघून जातात आणि माणसाला कोणताही त्रास देत नाहीत. पण प्रवासात एखाद्या घाटात माकडांची टोळी दिसू दे, कुत्र्यांची वा मांजरांची पिल्लं दिसोत, त्यांचे लाड करून त्यांना वेफर्स, बिस्किटं, पोळ्यांचे तुकडे, पराठ्यांचे घास, केळी, फळं खाऊ घालण्यात माणसांना फार आनंद वाटतो. खरेतर, जे चिप्स, बिस्किटं यांच्यासारखे प्रोसेस्ड फूड आपल्यासाठी सुद्धा योग्य नसताना प्राण्यांना ते लागू पडेल का, याचा विचारही आपण करत नाही. असं करणं गुन्हा आहे, याची जाणीवही आपल्या मनाला शिवत नाही. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचेही गंभीर परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकारे पक्ष्यांना, प्राण्यांना खायला घालून भूतदया जपत बसायची की माणसांचे आरोग्य सांभाळायचे हे आपणच ठरवायचे आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"