“पंतप्रधानांसह ९ केंद्रीय मंत्री, १९ राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीं”, शपथविधी सोहळ्याला येणार!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळाला आहे. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांनी दोनशेहून अधिक जागा, तर भाजपाने एकट्याने १३2 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. यासाठी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
शपथविधी सोहळ्याला “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी असे नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील. त्याबरोबरच १९ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत”.
याबरोबरच सर्वधर्मीय गुरूवर्य, साधुसंतदेखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला येणार आहेत. याशिवाय पाच ते दहा हजार लाडक्या बहिणी येतील, त्यांची वेगळी बसण्याची सोय केली आहे. मुंबईतील हाऊसिंग सोसायटींचे चेअरमन-सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील. कार्यकर्ते आणि दोन ते अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार आहेत . वारकरी, डब्बेवाले येणार आहेत आणि ४० ते ५० हजारांहून कार्यकर्ते सभास्थळी दिसतील. आझाद मैदान येथे आम्ही ४० हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केला आहे. त्याव्यतिरिक्त दोन हजार व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींची वेगळी व्यवस्था केली आहे. हा एक अभूतपूर्व सोहळा संपूर्ण देशात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात जेथे एलईडी स्क्रीन आहेत तेथे हा सोहळा लाईव्ह दाखवला जाईल.