महायुतीच्या उमेदवारांना भरभरुन मतदान करणाऱ्या मतदार बांधवांचे आभार : अजित पवार

मुंबई : “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेनं महायुतीच्या विकासकाम तसंच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कष्टातून आज हे यश मिळालं आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या अभूतपूर्व विजयावर प्रतिक्रिया देताना म्ह़टले.
महायुती सरकारनं आणलेल्या ‘लाडकी बहिण’सारख्या अनेक योजनांना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी महायुतीचे लाखो कार्यकर्ते राबले तसंच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मनापासून काम केलं, त्या सर्वांना या यशाचं श्रेय जातं. महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक भरभरुन मतदान केलं. राज्यातल्या समस्त जनतेनं विश्वासानं एकमुखी पाठिंबा दिला. या सर्व मतदारांचं, नागरिकांचं मी मनापासून आभार मानतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय पटावर नवा अध्याय लिहिला गेला आहे. या यशाचे सर्वाधिक श्रेय लाडक्या बहिणींना आहे. त्यांचे मी विशेष आभार मानतो, असेही अजित पवार म्हणाले. महायुतीचे विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवकांच्या विश्वासाची आणि एकजुटीची विजयगाथा आहे.
महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. हे फक्त निवडणुकीतील यश नसून राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षांचा विजय आहे. राज्यातील प्रत्येक घटकाने आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या जनतेच्या प्रतिसादाचे कौतुक केले आणि त्यांच्या भावनिक समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटकातील जनतेने दिलेला पाठिंबा हा आमच्यासाठी मोठे बळ आहे. राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. हा केवळ महायुतीचा राजकीय विजय नसून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला, कामगार, उद्योजक आणि वंचित घटकांच्या इच्छा आणि आकांक्षांचा विजय आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारे धोरण आखणे आणि ते अंमलात आणणे हा आमचा निर्धार आहे.
महायुतीतील सहकारी मित्र पक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन आपले कर्तव्य बजावले. हे यश या सर्व घटकांच्या एकजुटीचे फलित आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी दारे उघडली जातील. महायुती सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या राज्य सरकारमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सुद्धा यानिमित्ताने आभार मानतो. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यापक योजना राबविण्याचा महायुतीचा संकल्प असून आता आम्ही महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी झटणार आहोत. विकास, रोजगार, कृषी सुधारणा, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचे आमचे ध्येय आहे.