वायनाडमध्ये भूस्खलनात १२३ जणांचा मृत्यू

केरळ : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मेप्पाडी येथे भूस्खलन होऊन सुमारे ८४ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. चूरलमाला शहरातील अनेक घरं, गाड्या आणि दुकानं पाण्यात बुडाली आहेत. यात अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी बचावपथक कार्यरत असून पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलीय. अग्निशामन दल, एनडीआरएफ, कन्नूर डिफेन्स कॉर्प्स आणि नौदलाचे हेलिकॉप्टर्स बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनास्थळी असलेला पूल कोसळल्यानं आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात काहीसे अडथळे येत आहेत.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय एक अतिरिक्त एनडीआरएफ टीम पाठवण्यात आलीय. केएसडीएमएने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरीटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचावकार्यासाठी वायनाडला जाण्याचे आदेश दिले आहे.मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर मातीचा ढिगारा असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झालाआहे. चूराल्लमाला ते मुंदाक्काई आणि अट्टामाला भागाला जोडणारं पूलही कोसळल्यानं बचावकार्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.