नागपूर जाळपोळीची नुकसानाची भरपाई दंगेखोरांकडून वसूलणार : देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी हिंसाचार , दगडफेक अन् जाळपोळीच्या घटनेमुळे नागपूर होरपळून निघाले होते. जे नुकसान झालं ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. पोलिसांकडून याप्रकरणात तात्काळ कारवाई करत अनेकांना ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आले होते. त्यानी नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर दंगलखोरांना इशारा दिला.
औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र, कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी जमाव आला, तोडफोड केली. जाळपोळ केली. लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी चार पाच तासातच या संपूर्ण दंगलीला अटकाव केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज होते, खाजगी लोकांनी जे मोबाईलवर चित्रीकरण केलं ते असेल पोलिसांनी जे चित्रीकरण केलं, जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अजूनही आयडेंटिफिकेोशन सुरू आहे. अजूनही लोक आहेत. त्यांनाही अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगेखोरांना मदत करताना दिसतोय त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता आहे. आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहे, 12 लोकं हे 18 वर्षांच्याखालचे आहेत. त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे.
ज्यांचं नुकसान झालं, गाड्या फुटल्या, अर्धवट गाड्या फुटल्या त्या सर्वांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसांत दिली जाईल. आता जो काही आपण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे थोडं जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राहील.