पिंपरी-चिंचवडकरांच्या अस्मितेचा अपमान खपवून घेणार नाही: आमदार जगताप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेले विधान वृत्तपत्र आणि “न्यूज चॅनल”वरील बातम्यांमधून माझ्या पाहण्यात आले. हे विधान अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे. ज्या शहराने शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले, त्या शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिक आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा अपमान आहे.

“पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. अशा पवित्र भूमीबद्दल ‘जगात कोणी ओळखत नाही’ असे विधान करणे, म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अवमान आहे.”
माझा आयुक्तांना सल्ला आहे की, त्यांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. मोदीजी आणि फडणवीसजींच्या स्वप्नातील हे शहर स्वयंभू आहे. पिंपरी-चिंचवडची ओळख पुसण्याचा किंवा येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.
” पंतप्रधान .नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना, पिंपरी-चिंचवडने या प्रगतीत ‘इंडस्ट्रियल इंजिन’ म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या दूरदृष्टीने या शहराला ‘आयटी हब’ आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी जे बळ दिले, त्यामुळेच आज हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे. टाटा, मर्सिडीज बेंझ आणि फोक्सवॅगन सारख्या कंपन्यांमुळे आज आपली ओळख सातासमुद्रापार आहे.”
हे वैभव इथल्या कष्टकरी, भूमिपुत्रांच्या त्यागातून उभे राहिले आहे. आपल्या जमिनी देऊन या शहराला प्रगत बनवण्यासाठी स्थानिकांनी मोठे योगदान दिले आहे. प्रशासकीय प्रमुखाच्या खुर्चीवर बसून शहराच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगतीची थट्टा करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आयुक्तांच्या या विधानामुळे उद्योजक, तरुण पिढी आणि सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

