कोणते पदार्थ थंडीत आवर्जून खावेत?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
हिवाळ्याचा ऋतू हा उत्तम आहाराचे सेवन करून व्यायामाने शरीर सुदृढ करण्याचा किंवा आरोग्य उत्तम राखण्याचा काळ असतो, असे मानले जाते. अनेकजण हिवाळ्यापासून व्यायामाला सुरुवात करतात. किंवा दैनंदिन व्यायाम करणारी मंडळी हिवाळ्यात अधिक जोमाने व्यायाम करतात आणि त्यानुसार आपल्या आहाराची आखणी सुद्धा करतात. ती नेमकी कशी करायची हे आपण जाणून घेऊया.

शरीराला गरज ऊर्जेची
हवेतला गारठा, शरीराचं कमी होणारं तापमान यामुळे शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ या काळात आवर्जून सेवन केले जातात. सुकामेवा, फळं, तीळ, गूळ, बाजरी, भाजीपाला हा आहार आवर्जून या काळात शरीरात गेला पाहिजे. या काळात शरीराला ऊर्जेची गरज जास्त असते. हिवाळ्यात आपली पचनशक्ती उत्तम असते. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने थंडीच्या दिवसात सुकामेव्याचे लाडू, डिंकाचे केले जातात. हळीवाचे लाडू केले जातात. या पदार्थांमधून प्रथिने, लोह, कॅल्शिअम हे भरपूर प्रमाणात शरीराला मिळू शकतं.

गरम पेय कोणतं घ्याल?
उष्ण पदार्थांबरोबरच शरीराल गरम, वाफाळते पेय सुद्धा प्यावे, अशी इच्छा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये निर्माण होत असते. मग यासाठी सतत चहा, कॉफीचे सेवन करण्याऐवजी कहावा, हर्बल टी, ग्रीन टी घेता येईल. तुळस, गवती चहा, गरम मसाले, खडी साखर वापरून काढा करता येईल. तसेच भाज्यांचे वेगवेगळे सूप करून पिण्यासाठी घेता येतील. हे सगळे पदार्थ आवर्जून गरम असतानाच प्यावेत.

आहारत कोणती फळे घ्यावीत?
हिवाळ्यात बाजारात गाजर भरपूर मिळतात. गाजरात अ जीवनसत्व असते. ते खावे. संत्री, आवळा, डाळींब अशी एक ते दोन फळे रोजच्या आहारात समाविष्ट करावीत. फळांचे रस घ्यावेत. कारण हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा फारशी होत नसते. पण तरीही दोन ते तीन लीटर पाणी पोटात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याबरोबरच फळांचे रसही घेतले तर शरीरातल्या द्रव पदार्थाचा समतोल कायम राहू शकतो.