फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

दोन मारेकऱ्यांना पुण्यात ठोकल्या बेड्या ; आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी!

दोन मारेकऱ्यांना पुण्यात ठोकल्या बेड्या ; आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी!

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड शरणागतीनंतर संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी फरार असलेल्या ३ आरोपींपैकी दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. CID पथक आणि SIT द्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आज त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सहआरोपी सुधीर सांगळेला काल रात्री पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी न्यायालयात आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून करण्यात आली. हे तिघेही टोळीने गुन्हे करणारे आरोपी असून संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. त्यामुळे तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला.

तसेच न्यायालयात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर म्हणाले की,सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे म्हटले.

तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करतांना म्हटले की, आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आली आहे. डिजिटल पुरावा प्राप्त झाला असल्याचे पोलीस म्हणत आहेत. आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुरुवातीला विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुलेच या हत्येमागचा मुख्य आरोपी आहे असं म्हटलं जात आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"