महायुतीची लाट: विरोधी पक्षनेताही नसणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट आहे हे निकालाने स्पष्ट केलं आहे. कारण २२० हून अधिक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीला आत्ताच्या कलांनुसार अवघ्या ५० जागांवर आघाडी मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालात वेगळं चित्र पाहण्यास मिळतं आहे. महाविकास आघाडीत असलेले तीन पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) या तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला आत्तापर्यंत २८ ही आमदार संख्या पार करता आलेली नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेताही नसेल अशा चर्चा होत आहेत.
विरोधी पक्ष नेत्यासंबंधीचा नियम?
महाराष्ट्रात २८८ जागा आहेत, सरकार स्थापनेसाठीची मॅजिक फिगर १४५ आहे. तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी २८८ जागांच्या एक दशांश आमदार पक्षाकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे २८८ च्या एक दशांश आमदार म्हणजेच २८ आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. मात्र तसं चित्र तिन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. जर विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर २८ आमदार असणं गरजेचं आहे. मात्र ही संख्या महाविकास आघाडीतल पक्षाला आत्ता तरी गाठताआली नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्हं आहेत.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३१ जागा मिळाल्या होत्या. तर, महायुतीला १७ जागा मिळाल्या होत्या.