मणिपूरच्या शांततेसाठी केंद्रावर दबाव आणा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : गेल्या १८ महिन्यांपासून मणिपूर अस्वस्थ आहे. सातत्याने हिंसाचार सुरू आहे. पण तरीही केंद्र सरकार त्यात कोणतीही चर्चा करण्यास तयार नाही. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह केंद्र सरकारने मणिपूरच्या शांततेसाठी भक्कम पावलं उचलावीत, हा आमचा आवाज त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचत नाही, त्यामुळंच महाराष्ट्राने या शांततेसाठी पुढाकार घेऊन केंद्रावर दबाव आणावा, अशी विनंती करायला आम्ही इथं आलो आहोत, अशी आर्त साद मणिपूरच्या पत्रकारांनी घातली.
सरहद संस्थेच्या वतीने ‘धगधगते मणिपूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मणिपूरच्या मन्नबा टीव्हीचे सहयोगी संपादक कैशम यैफबा, द मॉर्निंग बेलचे सहयोगी संपादक सरोजकुमार शर्मा, मणिपूर सरकारचा तीनदा उत्कृष्ट संपादक पुरस्कार प्राप्त पत्रकार ब्रोझेंद्रा निगोम्बा हे तीन संपादक सहभागी झाले होते. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार,संपादक नीलेश खरे, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार आदी उपस्थित होते.
चर्चेचं प्रतिनिधित्व करताना निगोम्बा म्हणाले, ‘आम्हाला एकात्म मणिपूर हवा आहे. मात्र कुकी आणि मैतई यांच्यातला संघर्ष वाढत चालला आहे. हिंसाचाराची सुरुवात कुकींकडून झाली आहे. त्यांना वेगळं अस्तित्व हवं असल्यानं ते शांततेच्या, संवादाच्या पावित्र्यात नाही.. मैतई आणि कुकी या दोन्ही समाजाचे सुमारे १६ हजार लोक निर्वासितांच्या छावण्यामध्ये राहत आहेत. अनेकांची घरे जळालेली आहेत. या भागात ज्यापासून ड्रग तयार केले जाते त्या पोपी वनस्पतीची लागवड वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करून केली जात आहे. या सगळ्याला कुकींना म्यानमारकडून आणि चीनकडून मदत मिळते आहे. ती रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुक्त संचार व्यवस्था’ (एफएमआर) बंद करण्याची घोषणा केली. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मैतई आणि कुकी यांच्यातला संघर्ष, ड्रग माफियांचा वाढते वर्चस्व यामुळे मणिपूर धगधगत आहे, त्यासाठी चर्चेतून आणि संवादातूनच मार्ग निघेल, त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेऊन केंद्रावर दबाव आणण्यासाठी तुमची मदत हवी आहे.’
सरोजकुमार म्हणाले, ‘मणिपूरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होईल, याचं कोणतंही चित्र आम्हाला आजतरी दिसत नाही. केंद्रानं हस्तक्षेप केल्यास हे चित्र नक्की बदलेल.’
‘मणिपूरचे लोक भयभीत आहे. इथल्या सामान्य माणसाला शांतता हवी आहे. गेल्या १८ महिन्यांपासून इथं कोणतेच सण, उत्सव साजरे होऊ शकलेले नाहीत,’ अशी भावना कैशम यांनी व्यक्त केली.
निलेश खरे म्हणाले, ‘तालिबानच्या प्रश्नाचे मूळ हे अफूच्या शेतीतच होते, मणिपूरमधेही ड्रग माफियांचे वर्चस्व वाढते आहे. मणिपूरप्रमाणेच आरक्षणावरून अनेक राज्यांत राजकारण सुरू आहे. मणिपूर हे सीमावर्ती राज्य असल्याने या दोन्ही गोष्टींकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण काश्मिरप्रमाणेच मणिपूरही भारताच्या आंतरिक आणि बाह्यसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. सीमावर्ती भाग इतका दीर्घकाळ अस्वस्थ राहणे हे देशाच्या एकात्मिक सुरक्षेसाठी धोकादायक आहे. काही दिवसांत, काही महिन्यांत हा प्रश्न सुटणारा नसला तरीही संवादाचा पूल उभारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.’
संजय नहार म्हणाले, ‘देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संवादाची सुरुवात महाराष्ट्राने केली आहे, असा इतिहास आहे. आता हीच भूमिका मणिपूरबाबतही महाराष्ट्राने घ्यायला हवी. या प्रश्नावर चर्चेतून नाही तर कृतीतून तोडगा काढण्याची गरज आहे. या कार्यक्रमातून याच कृतीला सुरुवात व्हावी, ही अपेक्षा आहे. प्रास्ताविक अनुज नहार यांनी केले. सूत्रसंचालन जाहिद भट यांनी केले. आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.