सैफवर हल्ला ही चिंताजनक बाब

शस्त्रक्रियेत प्लॅस्टिक सर्जनचीही आवश्यकता; हल्ला प्रकरणावरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई (वृत्तसंस्था) :अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यात त्याच्या शरीरावर एकूण सहा वार झाले आहेत. त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. सहापैकी एक वार पाठीवर मणक्याजवळ करण्यात आला आहे.
लीलावती रुग्णालयातील कॉस्मॅटिक सर्जन डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि भूलतज्ञ डॉ. निशा गांधी या टीमकडून सैफवर शस्त्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाचे सीओओ डॉ. उत्तमानी यांनी ही माहिती दिली. डॉक्टरांच्या टीममध्ये एका न्यूरोसर्जनचाही समावेश आहे. मनगटाजवळ असलेला घाव सुद्धा खोलवर गेला आहे. यावरील शस्त्रक्रिया करताना प्लास्टिक सर्जनची मदत घेतली जाणार आहे.
चोरीच्या उद्देशाने सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या बांद्रा येथील राहत्या घरी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला आहे, अशी माहिती सैफ याच्या पीआर टीमने दिली आहे. कुटुंबातील अन्य सदस्य सुरक्षित आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून चाहत्यांनी कोणत्याही अफांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अभिनेत्री करीना कपूर हिच्या पीआर टीमने केले आहे.
… तर सामान्यांचे काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो म्हणाले की, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हे चिंतेचे कारण आहे. कारण कडक सुरक्षा असलेल्या अशा हाय-प्रोफाइल लोकांवर त्यांच्या घुसून घरात हल्ला होऊ शकतो, तर सामान्य नागरिकांचे काय होईल. गेल्या २ – ३ वर्षांच्या काळात राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे महाराष्ट्रात कायद्याचा धाक कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे, असेही क्रॅस्टो म्हणाले.

चिंताजनक बाब
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा प्रकारचा हल्ला होणे, ही चिंतेची बाब आहे. हायप्रोफाइल परिसरात घरात झालेला हल्ला म्हणजे राज्यसरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.

कायदा सुरक्षा वाऱ्यावर
महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षा उरलेली नाही. मुंबई, बीड किंवा परभणी सगळीकडे कायदा आणि सुरक्षा वाऱ्यावर आहे. ही व्यवस्था आदल्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगत स्वागतामध्ये गुंतलेली होती. सैफ अली खान हा मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते. सगळी सुरक्षा त्यावेळी तिथे असणार. त्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय याचं राज्यकर्त्यांना काहीही वाटत नाही. राज्यात नेमकं काय चाललंय, याचा प्रश्न खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.