फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
कला साहित्य

इंद्रायणी साहित्य संमेलनात रंगली दिंडी

इंद्रायणी साहित्य संमेलनात रंगली दिंडी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : टाळ – मृदंगाच्या तालावरील ‘ज्ञानोबा – तुकाराम’ या जयघोषात तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यात साहित्यिक, रसिक आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या फुगड्या रंगल्या.

श्री नागेश्वर महाराज मंदिर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी (संमेलन स्थळ) पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते झाले. या संमेलनास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजीमहाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, पारंपरिक वेषातील बालवारकरी यांच्या टाळ – मृदंगाच्या तालावरील ‘ज्ञानोबा – तुकाराम’ या जयघोषात ग्रंथदिंडी मार्गस्थ होताना साहित्यिक, रसिक आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळल्या; आणि शंखनाद केला. दीपप्रज्वलन आणि ज्ञानोबा – तुकोबांच्या प्रतिमांचे पूजन करून चौघडावादनाच्या पार्श्‍वसंगीतावर संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट यांच्या मातोश्री कौसाबाई बोराटे आणि सासूबाई भामाबाई आल्हाट यांची ग्रंथतुला करण्यात आली.

वंदना आल्हाट यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते ‘अक्षर इंद्रायणी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संपादक संदीप तापकीर यांनी स्मरणिकेचे अंतरंग उलगडून सांगताना, नवोदित आणि ज्येष्ठ तसेच स्थानिक साहित्यिकांनी लिहिते व्हावे, हाच प्रयत्न स्मरणिकेतून केला असल्याचे सांगितले. ‘स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा’ या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी होते. संयोजन उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, कार्याध्यक्ष सोपान खुडे, सदस्य डॉ. पौर्णिमा कोल्हे, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"