फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील महावितरणच्या २२ के.व्ही. स्तराच्या रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करावे !

पिंपरी चिंचवडमधील महावितरणच्या २२ के.व्ही. स्तराच्या रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करावे !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महावितरणच्या २२ के.व्ही. स्तराच्या रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करावे आणि अखंडित वीज पुरवठा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी गाव, तळवडे, चिखली, च-होली, दिघी, मोशी या भागात दाट लोकवस्ती आहे. तसेच, भोसरी एम.आय.डी.सी जे. एफ. एस व डी ब्लॉक, सेक्टर १० आणि १२ या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी येथे राहतात. भोसरी मतदार संघामध्ये लघुदाब घरगुती ३ लाख ६२ हजार २१६, वाणिज्य ३७ हजार ४१५, औद्योगिक १७ हजार ७९२ इतर ४ हजार २४९ व उच्चदाब ५९३ ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना प्राथमिक वितरण २२ के.व्ही. वीजस्तर विद्युत वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो.
शहरात इंद्रायणीनगर परिसरामध्ये दि.५ सप्टेंबर २०२० रोजी विद्युत प्राणांकित अपघात झाला होता. सदर अपघात २२/०.४३३ के.व्ही. विदयुत रोहित्र फुटून, रोहित्रातील तेल दूरवर फेकले गेले व हे गरम तेल तेथे जवळ राहत असलेल्या व्यक्तीवर पडून प्राणांकित अघपात घडला. तसेच २००९-१० मध्ये नेवाळे मळा २२/०.४३३ के. व्ही. विदयुत रोहित्र फुटून रोहित्रामधील तेल १००-१५० फुट दूर फेकले गेले व एक महिला सदर परिसरामध्ये भांडी धुत असताना महिलेच्या अंगावर तेल पडून सदर महिला ४५ टक्के भाजली. सदर घटना अतिशय दूर्दैवी आहेत. २२ के.व्ही. वीज स्तर उच्च क्षमता असल्यामुळे रोहित्रामधील बिघाट झाल्यास रोहित्रामधील तेलाचे तापमान व दबावात वाढ होते. उच्च तापमानामुळे तेलामध्ये गॅस तयार होतो, जो दबाव निर्माण करतो. हा दबाव नियंत्रित न झाल्यास रोहित्राची बाहय संरचना फाटते व स्फोट होऊन तेल जास्त दबावाने बाहेर दूरवर फेकले जाते. सदर कारणामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दाट लोकवस्तीमध्ये सदर प्रकारची अपघात होऊ नये यासाठी वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. विशेषतः उच्च कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी २२ के. व्ही. व्होल्टेज क्षमता ११ के. व्ही. व्होल्टेजमध्ये रूपांतरण करणे गरजेचे आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

२२ के. व्ही. वाहिनी पुरवठ्याच्या समस्या
१) २२ के.व्ही. वितरणामध्ये अधिक उर्जा नुकसान होते. उच्च व्होल्टेज वीज वितरणातील लांब अंतर वरील वाहिनीमध्ये उच्च प्रतिकारामुळे जास्त उर्जा गमावली जाते व त्यामुळे एकूण कार्यक्षमता कमी होते.
२) २२ के.व्ही. वितरणासाठी सबस्टेशन, रोहित्र, वाहकतारा व भूमिगत वाहिनी इ. साधनांचा खर्च अधिक असतो.
३) २२ के.व्ही. वीज पातळीचे वितरण अधिक जास्त देखभाल व नियंत्रणाची आवश्यकता असते.
४) २२ के.व्ही. वीज स्तर अधिक क्षमतेचा असल्या कारणाने तांत्रिक दोष, अधिक असतात व वीज पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन अधिक वेळा वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता वाढते.
५) २२ के.व्ही. वीज स्तराच्या वापरामुळे अधिक व्होल्टेज निर्माण होते. ज्यामुळे त्याच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना अधिक धोका असतो.
पुणे परिसरामध्ये कोथरूड, वारजे माळवाडी, सांगवी, हिजंवडी, ताथवडे, पर्वती, कोंढवा, वानवडी सदर ठिकाणी घरगुती ग्राहकांसाठी २२ के. व्ही. व्होल्टेज क्षमतेचे ११ के.व्ही. व्होल्टेजमध्ये रूपांतरण करणेत आले आहे. तसेच, वाशी, मुंबई सदर ठिकाणी देखील घरगुती ग्राहकांसाठी २२ के. व्ही. व्होल्टेज क्षमतेचे ११ के.व्ही. व्होल्टेजमध्ये रूपांतरण करणेत आले आहे. याच धर्तीवर, शहरात सर्व ठिकाणी २२ के.व्ही. स्तराच्या रोहित्राचे ११ के.व्ही. रोहित्रांमध्ये रूपांतरण करावे. ज्यामुळे वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम, स्थिर आणि विनाव्यत्यय होईल, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"