पिंपरी – चिंचवड महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा

पिंपरी, प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक लांबविल्या जात आहेत. स्थानिक आमदार आपल्या सोयीने येथे अधिकारी आणतात. यातून मनमानी कारभार केला जातो. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवड पालिकेचाही कारभार चालू असून ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत शुक्रवारी (नऊ ॲागस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. भोसरीमध्ये यात्रेचे रूपांतर सभेत झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार डॅा. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, मोहिनी लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, रविकांत वर्पे, गिता मंचरकर, गणेश भोंडवे, धनंजय भालेकर, प्रविण भालेकर, संजय नेवाळे, पंकज भालेकर,समिर मासुळकर, सुधीर मुंगसे उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे ताकदीने उभा आहे. हे आपण लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने पाहिले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३१ जागांवर भाजपला नागरिकांनी नाकारले. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार होते. भाजपचे लोक देशाची घटना बदलायला निघाले होते याची खात्री नागरिकांना पटली. विधान परिषदेत अनेकदा अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर एकाही मंत्र्याला उत्तर देता आले नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार अक्षरशः कळसाला पोहोचला आहे. हेच पिंपरी चिंचवड महापालिकेतही दिसून येत आहे म्हणूनच लोकसभेला परिवर्तनासाठी नागरिक पुढे आले तसेच परिवर्तन विधानसभेलाही होणार आहे.
नाशिक फाटा ते चांडोली कॅरीडोरबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले, या कामासाठी सुरुवातीपासून मी जो खर्च सांगितला आजही तो आकडा तेवढाच आहे. मात्र भोसरीमध्ये जादू होते. भोसरीतील शितल बाग येथील पादचारी पुल ७० लाखांवरून सात कोटीचा कसा झाला. पालिकेच्या दीडशे शाळांच्या ई लर्निंगच्या ४३ कोटीच्या कंत्राटाचे काय झाले. अर्बन स्ट्रीटसाठी ४५ कोटी घालून एका नाहक निष्पाप जीवाचा बळी जातो. एकीकडे इंद्रायणी थडी भरवायची, दुसरीकडे नमामि इंद्रायणी म्हणत इंद्रायणी माईच्या नावाखाली पैसे लाटायचे. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तब्बल चौदाशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत असे असतानाही दर दिवशी इंद्रायणी नदी फेसाळत असेल तर कोणत्या एसटीपी प्लांटमधून पाणी प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते हे देखील पहावे लागेल.
वगनाट्याने रंगत
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित वगनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर वगनाट्यातून भाष्य करत रंगत आणली.