शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार!

एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : लालपरीप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बसचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु याच प्रवासाबद्दल एसटी महामंडळ मोठा निर्णय घेणार आहे. लालपरीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली शिवशाही प्रवास कायमचा थांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचे वाढत्या अपघाताचे प्रकरण पाहता राज्य परिवहन महामंडळ शिवशाही बसची सेवा थांबविण्याच्या तयारीत आहे. नुकतेच शिवशाही बसचे गोंदियामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून याआधीही शिवशाही बसचे अनेक अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अपघाताचे वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. याशिवाय कंत्राटी कामगारांची अरेरावी,बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दर्लक्ष त्यामुळे येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवशाहीचे लालपरीत रुपांतर
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण ८९२ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस धावत असून उर्वरित ३९२ बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.