अनाधिकृत बांधकाम झाल्यास क्षेत्रीय अधिकारी जबाबदार : आयुक्तांचा इशारा

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका ही नावलौकिक असलेली राज्यातील महापालिका आहे .पिंपरी चिंचवड शहर हे जलद गतीने सध्या वाढत आहे. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. उत्पन्न वाढीबरोबरच पिण्याचे पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल. शहरात यापुढे अनाधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. अनाधिकृत बांधकामे झाल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रशासनाला दिला आहे .

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनधिकृत बांधकामाच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी विशेष भर दिला. यापुढे अनाधिकृत बांधकामे झाल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. अनाधिकृत बांधकामावर देखील कारवाई केली जाईल. रेड झोनचा नकाशा महापालिका लवकरच प्रसिद्ध करून कार्यवाही करेल असे त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने वाढत असल्याने दरवर्षी सुमारे सव्वा लाख लोकांची भर पडत आहे. सध्या शहराची लोकसंख्या 38 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेवर पाणीपुरवठ्याचा वेगळा ताण येत आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रमुख प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील 25 वर्षाचा विचार करावा लागेल. त्यानुसार नियोजन करण्यावर भर दिला जाईल.
पवना जलवाहिनी पूर्ण करणे तसेच भामा- आसखेड प्रकल्पाच्या भूमिगत जलवाहिनीचे उर्वरित काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करून शहराला 167 एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सध्या सर्वत्र पर्यावरण आणि प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नदी आणि हवा प्रदूषण अधिक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केला जाणार असून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील. धुळीचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. बांधकाम व्यावसायिक यासाठी उपाययोजना करताना आढळत नाहीत. यापुढे हे प्रदूषण कमी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

