बैलगाडा शर्यतीचे खरे मानकरी महेशदादाच !

- संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे कार्याध्यक्ष
महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणि सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर आणि रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती.
ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची, त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे भासवून न्यायालयातून बैलगाडा शर्तीवर बंदी आणण्यात आली होती आणि त्यामुळे शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता. पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले. आणि शेतकऱ्याच्या दावणीला दिसणारी बैलजोडी फक्त चित्रातच दिसू लागली. हाच तो काळ होता, जेव्हा आमदार महेशदादा लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप बोदगे यांचा एकमेकांशी संपर्क आला. श्री. बोदगे यांनी स्वतः यासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातून महेशदादांचा आणि माझा संपर्क आला. मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. दादांना देखील बैलगाडा शर्यतीची आवड आहे. त्यांना खिलार जातीच्या बैलांच्या संगोपनाची आवड आहे. महेशदादांच्या वडीलांच्या काळापासून त्यांच्याकडे खिलार बैल आणि त्यांची जोपासना होते. बैलगाडा शर्यती बंद पडल्यानंतर या विषयात लक्ष घालण्यासाठी आम्ही दादांना विनंती केली होती. शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आमचे म्हणणे होते. या संदर्भाने आमचा संपर्क सुरू झाला.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २०१५ मध्ये आळंदीत आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलन झाल्यानंतर दादांनी सरकारकडे मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमच्या संघाटनेची बैठक दादांनी घडवून आणली. त्यानंतर कित्येकदा मंत्रालयात बैलगाडा शर्यतीसंदर्भात बैठका झाल्या. त्यावेळी आमदार महेशदादा यांनी खूप मदत केली.
महेशदादा हे एक व्यक्ती म्हणून खूप दिलदार माणूस आहेत. अगदी सामान्य व्यक्तीसुद्धा आपली समस्या घेऊन त्यांना भेटू शकते, इतके ते डाऊन टू अर्थ आहेत. त्यांना प्रत्येक विषयात रस आहे. ते प्रत्येकाचा विषय समजून घेतात आणि त्यात काय करता येईल, याचा अभ्यास करतात. संवेदनशीलतेने त्यांनी आमचा विषय सुद्धा हाताळला आणि जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा आम्हाला मदत केली आहे.
शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. तेव्हाच २०१७ मध्ये या संदर्भात कायदा केला जावा म्हणून दादांच्या माध्यमातून सरकारला विनंती केली. तो कायदा होण्यामागे आमदार महेशदादा लांडगे यांचे खूप मोठे योगदान आहे. तो कायदा झाल्यानंतर उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिले गेले आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही संघटना म्हणून कोर्टात उभं राहणं, वकिलांची फी देणं हे आम्हाला शक्य नव्हतं. तेव्हा आम्ही दादांना विनंती केली की या केसचा खर्च शासनाने करावा. त्यावर दादांनी आमचे म्हणणे समजून घेत तातडीने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर बैठक घडवून आणली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हा खर्च राज्यशासन करेल, यासाठी संमती दिली. त्यामुळे उत्तम वकिलांची निवड, त्यांचा युक्तिवाद आणि न्यायालयातून हे प्रकरण यशस्वी निकाली काढण्यात सरकारची आणि दादांची आम्हाला मदत झाली.
माझ्या कुटुंबात शेती, बैलगाडा शर्यती या सगळ्याची पार्श्वभूमी असल्याने आणि मलाही बैलगाडा शर्यतीची आवड असल्याने या विषयावर मी फार सुरुवातीपासून काम करत होतो. भविष्यात बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत काही अडचणी आली किंवा देशी गो संवर्धन, खिलार बैलांच्या संवर्धनाच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण झाले तर त्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यास आम्हाला महेशदादा सगळ्यात जवळचे वाटतात. कारण मुळातच दादांना या संगोपनाची आवड आहे. त्यांना या प्रश्नाची जाण आहे, पुरेशी माहिती आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी या विषयावर अगदी मोकळेपणाने आणि विश्वासाने चर्चा करता येते, मार्ग काढता येतो. भविष्यात कधीही अडचण आली तर त्यांच्यासारखा आधार या क्षेत्रात असली पाहिजे, असे आम्हाला वाटते.