भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले

संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर भूमिका
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताने जागतिक शांतता, बहुपक्षीय सहकार्य आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका मांडली. भारताने पुन्हा एकदा दहशतवादाबाबत पाकिस्तानला फटकारले आहे. शीतयुद्धानंतर संघर्षांचे स्वरूप कसे बदलले आणि दहशतवादी संघटनांची भूमिका कशी वाढली हे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.

पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ यावेळी भारताने दिला. या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक कारवाईची देखील यावेळी माहिती दिली.
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना भारताने म्हटले की, एकीकडे, भारत एक परिपक्व लोकशाही, एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान असा देश आहे जो अतिरेकीपणा आणि दहशतवादात बुडालेला आहे.
भारताने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानी दहशतवादी शाळांवर हल्ला करून निष्पाप मुलांचे जीव घेतात आणि अफगाण सीमेवरील निर्वासित शिबिरांवर पाकिस्तानी सैन्य बॉम्ब हल्ला करते, ज्यात अनेक मुलांचा बळी जातो. अशा परिस्थितीत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. पी. हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

