फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
अध्यात्म

नामस्मरण वाढवते माणसाचे सामर्थ्य

नामस्मरण वाढवते माणसाचे सामर्थ्य

अॅड. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तनातून प्रबोधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहू, ता. ४ : नामस्मरणाचे महत्त्व विषद करीत नामस्मरणाचे फलित काय असते आणि त्यातून मिळणारी अनुभूती काय सांगते हे स्पष्ट करून देत कीर्तनकार अॅड. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन रंगले.

श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भाघ शुद्ध दशमी निमित्त सात दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील दुसऱ्या दिवशीचे कीर्तन जयवंत महाराज भोसले यांचे झाले.

सत्य साचे खरे | नाम विठोबाचे बरे ||
येणे तुटती बंधने | उभयलोकी कीर्ती जेणे ||

या अभंगावर त्यांचे कीर्तन झाले. मोक्षापर्यंत जायचे असेल परमेश्वराचे नाव स्मरण करा. भगवंताच्या नामाचे स्वरूप, त्याचा होणारा परिणाम त्यातून येणारी अनुभूती यामुळे नामधारकाचे सामर्थ्य वाढते, असे कीर्तनकार अॅड. जयवंत महाराज बोधले म्हणाले.

त्यांनी सांगितले की, समाजात आज साधन आहे. पण साध्य नाही. साध्य आहे तर साधन नाही ,अशी अवस्था आहे. तुकोबांचे चरित्र ज्ञानशास्त्रीय आणि भक्ती शास्त्रीय भूमिका असलेले या ठिकाणी दिसून येते. त्यात ते कुठे जायचे आणि कसे जायचे हे सांगतात. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. तुकोबांचा आंधळा पांगळा ,देश वेश नव्हे माझा व इतर उदाहरणे दिली. नाम साधनेची वैशिष्ट्ये सांगितली. साधन, साध्य ज्ञानस्वरूपता मिळून नामस्मरण होते. या भूतलावर अनेक डोंगर आहे मात्र तुकोबांनी केलेल्या नामस्मरणाने साक्षात पांडुरंग भंडारा डोंगरावर अवतरले आणि हा डोंगर तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला.

ते कीर्तनात म्हणाले की, तुकोबांच्या पत्नी जिजाई यांच्या पायातील काटा पांडुरंगाने काढला. हे नामस्मरणाचेच फलित आहे. नामाचे स्वरूप सांगताना बोधले महाराज म्हणाले, जिथे भेद नाही, अभाव नाही ते सत्य आहे. भगवंताच्या नामाचा नाश कधीही होत नाही. नाम स्मरणाने प्रत्येक क्षणाला नामाची गोडी वाढत जाते. सामान्य ते उच्च अनुभूतीपर्यंत जाता येते. साधना करत असताना अनेक संकटे येतात. त्यातून पुढे जाता येते. संकटे आली तरी नामाने चरित्र घडते आणि त्यातून ब्रह्माानुभूती प्राप्त होते. तुकोबांना ब्रह्मानुभूती प्राप्त झाली. तरी ते लोकांपासून दूर गेले नाहीत, शेवटी अंतकरणात भाव प्राप्त झाला तर परमेश्वराचा साक्षात्कार होतोच. त्यामुळे परमेश्वराचे नाम स्मरण करा आणि तुकोबांची गाथा घराघरात असू द्या. तरच त्या घराला घरपण असल्यासारखे वाटेल.

बुधवारचे कार्यक्रम
अखंड हरिनाम सप्ताहात बुधवारी सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी गाथा पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम होतील. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती यावर कथा निरूपण होईल.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"