नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्राप्तीकर विधेयक २०२५ सादर केले
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यावेळी नवीन विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्राप्तीकर विधेयक २०२५ सादर केले. हे विधेयक लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.ही समिती पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपला अहवाल लोकसभेत सादर करणार आहे. त्यानंतर सीतारामन यांनी लोकसभेत भाषण केले.
यावेळी बोलतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,लोकसभेच्या पटलावर मी हे विधेयक ठेवते आहे. आता आम्ही ५६१ कलमांचे विधेयक घेऊन आलो आहोत. मनिष तिवारी म्हणाले की नव्या प्राप्तिकर विधेयकात जास्त कलमं आहेत मात्र ते तसं नाही. आम्ही ८१९ कलमांऐवजी आता ५६१ कलमांचं विधेयक घेऊन आलो आहोत. आत्तापर्यंतच्या विधेयकात ४ हजारांहून अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे मनिष तिवारी यांनी बहुदा हे विधेयक पाहण्याचेही कष्ट घेतले नसावेत, असा टोला निर्मला सीतारामन यांनी लगावला.
पुढे त्या म्हणाल्या की, या विधेयकात आम्ही यांत्रिक नाही तर धोरणात्मक बदल केले आहेत. भारतीय कर प्रणालीमध्ये अनेक वर्षांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत, ज्यामुळे १९६१ चा प्राप्तिकर कायदा अधिकाधिक गुंतागुंतीचा झाला आहे. सध्याच्या कर फ्रेमवर्कमध्ये अशा अनेक सूट, वजावट आणि तरतुदींचा समावेश आहे; ज्यामुळे अनेकदा करदात्यांमध्ये गोंधळ होतो आणि कर विभाग व व्यक्ती किंवा व्यवसाय यांच्यात वाद निर्माण होतात. सरकार अनेक वर्षांपासून करविषयक कायदे सुलभ करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
नवीन कायद्यात नेमकं काय?
या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर हे सहा दशके जुन्या आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. पूर्वीचा कायदा विविध सुधारणांनंतर गुंतागुंतीचा बनला आहे. सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन कायद्यात आयकर कायदा, १९६१ मध्ये नमूद केलेले मागील वर्ष (FY) शब्द बदलून कर वर्ष करण्यात आला आहे. यासह मूल्यांकन वर्ष (AY) ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे. आयकर विधेयक, २०२५ मध्ये ५३६ कलमे आहेत, जी सध्याच्या आयकर कायदा, १९६१ च्या २९८ कलमांपेक्षा जास्त आहेत. सध्याच्या कायद्यात १४ अनुसूची आहेत, तर नव्या कायद्यात १६ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन विधेयकात प्रकरणांची संख्या केवळ २३ ठेवण्यात आली आहे. तसेच, पानांची संख्या कमी करून ६२२ वर आणली गेली आहे.