नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची चेंगराचेंगरी
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (15 फेबुवारी) एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री (15 फेबुवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अचानक रात्री 8.30-9 वाजताच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची घटना शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री 8.30-9 वाजताच्या सुमारास घडली. प्रयागराजला जाण्यासाठी स्टेशनवर हजारोंचा जमाव उपस्थित होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी सांगितले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर देखील उपस्थित होते. ते म्हणाले, रेल्वे दर तासाला 1500 जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 दरम्यान एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.