माता सदा सर्वकाळ वंदनीय: पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ

पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचा “हिंदू कुलभूषण” पुरस्कार देऊन सन्मान
पिंपरी : माता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. राजमाता जिजाऊ यांच्यामुळे शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. या मातेचे पूजन ही आपली संस्कृती आहे. मग ती भूमाता, राजमाता, किंवा सामान्य जणांची माता असो ती सदा सर्वकाळ वंदनीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, शिवजयंती उत्सवाचे समन्वयक कैलास बारणे व खजिनदार दत्ता सूर्यवंशी, सुहास पोफळे, अतुल आचार्य, कुमार जाधव, रमेश स्वामी, दिलीप कुलकर्णी, दिगंबर रिद्धीवाडे, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, शिवाजी रेड्डी, ॲड. देवदास शिंदे, मनोज गोबे, मनोज बोरसे, सुरेंद्र कर्मचंदानी अलका आर्य, तेजस्विनी जटाळ आदी उपस्थित होते.
यावेळी पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, जसा समाज असतो तसे नेते असतात. ज्या व्यक्ती मध्ये पुरुषार्थ नाही, अशा व्यक्तींना समाजाकडून निवडून दिले जाते. आजचा समाज एक किलो तांदूळ, एक महिना मोफत वीज, एक साडी मध्ये आपला स्वाभिमान विकून दोन कवडीच्या नेत्याला निवडून देत आहे. हे समाजाचा स्तर खाली गेल्याचे लक्षण आहे. अशा मुर्खांची संख्या भारतात भरपूर आहे. संसदेत बोलणाऱ्या खासदारांनी किमान तयारी करुन चर्चेत सहभाग घ्यावा व नंतर आपले मत व्यक्त करावे. १९७६ मध्ये देशातील सर्व राजकीय पक्षांनी भारताच्या उद्देशिकेत कोणत्याही चर्चे शिवाय धर्मनिरपेक्षित हा शब्द घातला. यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. संसद सभागृहात आपला स्वार्थ समोर ठेवून राजकीय मुद्दा मांडू नये, तर राष्ट्रीय स्वार्थ नजरेसमोर ठेवून राजकीय मुद्दा मांडला पाहिजे असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काही लोकांनी केवळ एका जातीच्या चौकटीत बसवले . काही लोक जाणून बुजून त्यांचे खरे कार्य लोकांच्या नजरेसमोर आणण्यास इच्छुक नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यापेक्षा मोठे व्हायला नको संसदेतील चर्चेत धर्मनिरपेक्षते बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य मुद्दा होता. भारताच्या मातीत आणि सनातनी च्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे. या धर्मनिरपेक्षतेला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नका असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.
सावरकर ही व्यक्ती नसून विचार आहे. आरती, पूजापाठ करून कुणी हिंदू होत नाही, आचरणाने हिंदू झाले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात हिंदूंनी दुसऱ्याच्या धर्मस्थळावर, पूजा पद्धतींवर आक्रमण केल्याचे उदाहरण नाही. ही वेळ हिंदू मुस्लिम करण्याची नाही. तर सनातन सभेची पुनर्स्थापना करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. हिंदू संस्कृती पुढच्या पिढीकडे देण्याचे काम हिंदू प्रतिष्ठान करत आहे. सनातन एक सभ्यता आहे, विज्ञान आहे, पंचतत्व आहे. शब्दांचा अनर्थ सनातनी हिंदूंनीच केला आहे. सनातन हा धर्म ब्रम्हांडाचा उत्पत्ती पासून आहे. स्वागत कृष्णकुमार गोयल, सूत्रसंचालन व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोकळे यांनी मानले.