फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

लाखो मांडे आणि पुरणपोळ्यांचा प्रसाद

लाखो मांडे आणि पुरणपोळ्यांचा प्रसाद

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळ्यातील प्रसाद नियोजन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी :  क्षुधेलिया अन्न | द्यावे पात्र न विचारून || द्रव्य वेचावे अन्नक्षेत्री | भूती द्यावे सर्वत्र || तुकोबारायांनी अन्नदानाचे महत्व सांगितले आहे. त्यानुसार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी भाकरी आणि आमटीचा प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी कसे आहे या प्रसादाचे नियोजन ते जाणून घेऊ.

दान धर्मापेक्षा भुकेलेल्याला केलेले अन्नदान हे कधीही चांगलेच असल्याचे सांगीतले आहे.
तुकोबाराय म्हणतात भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करावे.गरजू असलेल्या व्यक्तीचे पोट भरावे.हे अन्नदान करतांना तो कोण आहे विचारू नये,पाहू नये.त्याचे पाञ विचारू नये.यातच खरा धर्म आहे.भुकेल्याला अन्नदान म्हणजेच खरया धर्माचे वर्म होय.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी भाकरी आणि आमटीचा प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी निवास आणि प्रसादाची सोय करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील गावामधून भाकरी आमटीचा प्रसाद येथे गडावर आणण्यात येणार आहे. प्रत्येक गावच्या आमटीची चव वेगळी असते. यानिमित्ताने ती श्री तुकोबारायांना समर्पित केली जावी, या भावनेने भाविकांना प्रसाद म्हणूनही देण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली या पूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यासाठी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होत आहेत. मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.  जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान, घोरावडेश्वर डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वारकरी संप्रदाय यांचा संयोजनात सहभाग आहे.

असे आहे भाकरी आमटीचे नियोजन
प्रत्येक गावाला जी तारीख, वार आणि वेळ दिली आहे, त्याच दिवशी भाकरी, चपाती, कोरडा शिधा घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात गावांमध्ये ग्रामसभा झालेल्या आहेत. त्यानुसार गावातील भाविकांना याची कल्पना देण्यात आली आहे. प्रत्येक घरातून ११ भाकरी, आमटी, बुंदी, लापशी तसेच प्रसादासाठी काही आर्थिक मदत घेण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मंदिरातून, वाडीवस्तीवरून भाकरी, पोळीचा प्रसाद एकत्र करून ते डोंगरावर आणून दिला जाईल. सकाळी आणि संध्याकाळच्या प्रसादासाठी वेगवेगळ्या गावांना याबाबतचे नियोजन करून देण्यात आले आहे.

शिरूर तालुका, मावळ तालुका, हवेली तालुका, खेड तालुका, पुणे महापालिकेतील गावे आणि नगरे, पुरंदर तालुका, वेल्हा तालुका, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गावे आणि नगरे येथील विविध गावांमधून हा प्रसाद येणार आहे. तसेच गुरुवारी १३ मार्च रोजी मुळशी तालुका यांच्यावतीने पुरणपोळीचा प्रसाद देण्यात येणार आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे आणि पाच लाख पुरणपोळीच्या प्रसादाची सोय करण्यात येणार आहे.  

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"