ते पुन्हा येणार…

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मी पुन्हा येईन.. असे ठासून सांगूनही; उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलेले देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेतील, असे वृत्त आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी आझाद मैदानावर हा शपथविधी होईल, असे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार या मुद्द्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पक्षच सर्वश्रेष्ठ ठरला होता. तरी सिंहासनासाठी आठवडाभर चर्चेच्या फेऱ्या पार पडत होत्या. कोणती खाती कोणाकडे असावी? मंत्रिमंडळ कसं असावं? याचीही चर्चा सुरू होती. आता मुख्यमंत्र्यांसह किमान २० जणांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दिल्लीतील बैठकीत खाते वाटपावरूनही खलबतं झालीत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर यांना गृहखातं देण्यास भाजपा तयार नाही. त्याऐवजी, नगरविकास खातं देण्याची तयारी दाखवत केंद्रात शिवसेनेला मंत्रिपद देण्यासही तयार आहे. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थखातं देण्यावर एकमत झालंय. यासह केंद्रात राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्री पद, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा अशी खाती मिळू शकतात. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती दिली जाणार असल्याची शक्यता आहे. यासोबत भाजपकडे गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृह निर्माण, वन खातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचं पारडं जडच असणार असल्याचे दिसतंय.