मराठा समाजासाठी आचारसंहिता घालून घेणे आवश्यक!

चुकीच्या परंपरा निर्माण होत आहेत, याबाबत चिंता व्यक्त
पिंपरी : सद्यस्थितीमधील मराठा समाजातील विविध विधी, लग्नसमारंभ या अनुषंगाने अफाट खर्च होत आहे. तसेच चुकीच्या परंपरा निर्माण होत आहेत, याबाबत चिंता व्यक्त केली आणि समाजासाठी आचारसंहिता घालून घेणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या अनुषंगाने उपस्थित समाज बांधवांनी खालील प्रमाणे आचारसंहिता निश्चित केली.
मराठा समाजातील लग्नकार्य इतर विधी अनुषंगाने होणारा अफाट खर्च व अनिष्ट रूढी परंपरा या मध्ये सुधारणा घडवून आणणे कामी व या विषयावर, विचार विनिमय करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज बांधवांची सहविचार सभा पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे शनिवार दि.३१ मे रोजी पार पडली, या सभेसाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

- लग्नविधी निर्धारित वेळेनुसार व मुहूर्तावर लावावीत.
- प्री-वेडिंग शूट साठी होणारा अनावश्यक खर्च टाळावा.
- लग्न समारंभामध्ये होणारे मोठ्या प्रमाणात सत्कार टाळावेत.
- हुंड्याच्या नावाखाली किमती वस्तू भेट देणे पूर्णपणे बंद करावे.
- मांडव डहाळा, साखरपुडा, वरात, डीजे इत्यादीसाठी होणारा प्रचंड खर्च कमी करावा.
- लग्न समारंभाच्या अनुषंगाने मान्यवरांची लांबलचक भाषणे, आशीर्वाद याला मर्यादित स्वरूप द्यावे.
- अंत्यविधी, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध इत्यादी कार्यक्रमांमध्ये भाषण पूर्णपणे बंद करावे.
- लग्न व्यवस्था टिकवण्यासाठी मुला मुलींसाठी समुपदेशन करणे.
- निसर्ग व पर्यावरणाशी नाते जोडून लग्न व विविध समारंभ साजरे करावेत.
- लग्न समारंभ मोजक्या व्यक्तीमध्ये पार पाडावा व नंतर स्वागत समारंभ करावा. इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले
इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले .या सविचार सभेसाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष . राजेंद्र कोंढरे, महापालिका माजी अतिरिक्त आयुक्त अमृत सावंत, पिं.चिं. सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे, विठ्ठल वाळुंज, डॉ. केतकी आवटे, डॉ. गौरी चिंचवडे भोसकर, सौ. गीतांजली आवटे, सौ. रेखा कोंडे, महेश गावडे, राजाभाऊ गोलांडे, गजानन चिंचवडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पोटे यांनी केले.