“योजना हवी असेल तर आम्हाला मत द्या“

नाशिक : लाडकी बहीण योजना चालू रहावी असं वाटत असेल, तर आमच्या नावापुढची बटणं दाबा. तरच ही योजना सुरू राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
नाशिकमधील निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते. महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली, ती पुढे चालू ठेवायची म्हणून चालू केली, बंद करायची म्हणून नाही. यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवलं पाहिजे, तरंच ही योजना सुरु राहील, त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत, असे ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील प्रमुख घटक पक्षांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आता कंबर कसली आहे हे या भाषणाने दाखवून दिले. ते म्हणाले, महिला आणि तरुण वर्गासाठी आम्ही सरकारच्या योजना आणल्या, त्यात राष्ट्रवादीचं मोठं योगदान आहे. अर्थमंत्री म्हणून मी स्वत: या योजनांचा अभ्यास केला आहे. महिलांना मान सन्मान प्राप्त करुन देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून ही योजना आम्ही आणली, खर्चाचा अभ्यास आम्ही केला, वायफळ खर्च कमी करुन काटकसर कशी करावी, हे सगळं पाहिलं. थेंबेथेंबे तळे साचे असतं त्याप्रकारे साडेतेरा कोटी जनतेचा संसार आम्ही करत आहोत. महायुतीचं सरकार भगिनींना भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही, जुलै ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसै १७ तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील, अशा शब्दांत अजित पवारांनी महिलांना आश्वासित केले आहे.