हातगाडी पंचायतीचा `काम बंद`चा इशारा

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडीधारकांना येत्या पंधरा दिवसांत परवाने द्या. अन्यथा, महापालिकेला टाळा ठोकून महापालिका कामकाज बंद पाडू, असा इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.
या संदर्भात बाबा कांबळे म्हणाले, शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत कारवाई होत आहे. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न सोडवण्याबाबत मागणी केली होती. निवेदनही सादर केले होते. मात्र, तोडगा निघत नाही. त्यामुळे मोर्चा काढण्याची वेळ आली. आगामी काळात अधिक आक्रमक आंदोलन करून मागण्या मान्य करायला भाग पाडू.
टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या प्रश्नांवर संघटनेच्या वतीने कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे पदाधिकारी बळीराम काकडे, प्रकाश यशवंते, रमेश शिंदे , मेहबूब पटेल, सरोज कुचेकर, ज्योती कांबळे, राजू प्रभू उपस्थित होते.
काय आहेत संघटनेच्या मागण्या?
- सामाजिक सुरक्षेची हमी
- पीएम स्वनिधीद्वारे कर्ज व अनुदान
- आरोग्य व अपघाती विमा
- आधुनिक पद्धतीने हातगाडी व स्टॅन्ड
- पुनर्वसनाशिवाय कारवाई नको
- सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांना परवाने
- पात्र धारकाचे पक्क्या पुनर्वसन
- फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी