पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘चालक दिवस’ उत्साहात साजरा होणार!

प्रामाणिक रिक्षाचालकांचा RTO कडून गौरव; महाराष्ट्रातील पहिल्या ‘इलेक्ट्रिक कन्व्हर्टेड’ रिक्षाचे होणार लोकार्पण
पिंपरी : महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर हा दिवस ‘चालक दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात हा दिवस प्रथमच एका भव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अथक परिश्रमाला आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयाचे संदेश चव्हाण, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे बापू गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
प्रामाणिकतेचा होणार सन्मान
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, रिक्षा चालकांनी दाखवलेली प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवा. ज्या रिक्षा चालकांनी आपल्या गाडीमध्ये प्रवाशांनी विसरलेल्या मौल्यवान वस्तू (उदा. सोने, रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप) व महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केली, अशा ‘प्रामाणिकतेच्या दूतांचा’ RTO मार्फत अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. यासोबतच, दीर्घकाळ सेवा बजावलेल्या ज्येष्ठ रिक्षा चालकांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ
इंधन दरवाढ आणि पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमात एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या ‘पेट्रोल रिक्षाचे इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतर’ (Petrol to Electric Conversion) केलेल्या रिक्षाला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ती प्रवासी सेवेसाठी समर्पित केली जाईल. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासह रिक्षा चालकांच्या इंधन खर्चात बचत करण्यासाठी एक क्रांतीकारी पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ठीक १:०० वाजता होईल. यानंतर, रिक्षा चालकांची एक भव्य रॅली मोरवाडी मार्गे काढण्यात येईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक बांधवांनी मोठ्या संख्येने आणि एकजुटीने उपस्थित राहावे असे आवाहन बाबा कांबळे यैंनी केले आहे.

