नशामुक्त भारत ही काळाची गरज : ॲड. सतिश गोरडे

पिंपरी : ‘जागतिक स्तरावर वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आणि विश्वगुरू म्हणून भारताला मान्यता मिळत असताना नशामुक्त भारत ही ओळख प्रस्थापित होणे ही काळाची गरज आहे असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी इंटेलिजन्स कॅडेट इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद पिंपरी – चिंचवड जिल्हा आणि बजरंग दल आयोजित दोन दिवसीय अभ्यास वर्गाच्या समारोपप्रसंगी ॲड. सतिश गोरडे बोलत होते. व्यासपीठावर बजरंग दल प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, प्रांत सुरक्षा प्रमुख सुशांत गाडे, विभाग संयोजक नाना सांवत, जिल्हा संयोजक अरविंद लंघे, जिल्हा सहसंयोजक पन्नालाल जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘जागतिक स्तरावर भारत अतिशय वेगाने आर्थिक प्रगतीसह सर्वच क्षेत्रांत मानाचे अन् आदराचे स्थान प्राप्त करीत असताना शत्रुराष्टे अंमली आणि मादक पदार्थांच्या माध्यमातून आपल्या देशातील तरुणाईला निष्प्रभ करणाचे षडयंत्र सातत्याने राबवत आहे. मादक आणि अंमली पदार्थांचे व्यसन हे फक्त उच्चभ्रू सोसायटीत आहे, असा आपला सर्वांचा आतापर्यंत गैरसमज होता; परंतु उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन तरुणाई ही मादक आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेली आहे, असे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. मध्यमवर्गीय आईवडील नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतात; आणि याचा गैरफायदा घेऊन त्या घरातील किशोरवयीन मुलामुलींना वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात. त्यामुळे ही मुले आईवडिलांच्या नकळत अंमली पदार्थांची वाहतूक करणे, सेवन करणे किंवा साठा करणे अशा अपप्रवृत्तींना बळी पडतात.
पोलिसांच्या कारवाईत जेव्हा या गोष्टी उघड होतात, तेव्हा आईवडिलांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो. वास्तविक भारतीय राज्यघटनेतील ४७-अ या कलमानुसार मादक पदार्थांचा साठा करणे, विक्री करणे, वाहतूक करणे आणि त्यासंदर्भातील पूरक कामे हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे संवेदनशील अशा तरुणाईला या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. दिवाळी पाडव्यापासून हिंदू संस्कृतीचे नवीन वर्ष सुरू होते. या नववर्षाचे औचित्य साधून बजरंग दलाने व्यापक प्रमाणावर ‘नशामुक्त भारत’ हा उपक्रम राबवावा. या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत सर्व पोलीस स्थानकात याबाबत निवेदन देण्यात यावे. सातत्याने या उपक्रमाचा पाठपुरावा करण्यात यावा!’ असे आवाहन त्यांनी केले.
दोन दिवसीय अभ्यास वर्ग
जिल्हा मंत्री धनंजय गावडे, भास्कर भगत, सह मंत्री संभाजी बालघरे, चैतन्य सुडे यांनीदेखील मार्गदर्शन केले.पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील ११ प्रखंडातील बजरंगदलाचे पदाधिकारी या अभ्यासवर्गात सहभागी झाले होते.

