बस्स.. आता खूप झालं..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पुढं आलं होतं. याशिवाय इतरही राज्यातून अशाच प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनांवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भाष्य केलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना महिला अत्याचारांवरील घटनांसंदर्भात त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली.
समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंश आहे
त्या म्हणाल्या की, कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे. या घटनेच्या निषेधार्थ कोलकाता येथे नागरिक, विद्यार्थी आणि डॉक्टर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना, अन्यत्र आणखी कोणीतरी गुन्हेगार अन्य पीडितेला शोधत फिरत होतेच. ज्या समाजाला आपल्या इतिहासाला सामोरे जाण्याची भीती वाटते, त्यांनाच अशा नृशंस घटनांचा सोयीस्कर विसर पडतो.