चिखलीतील उद्योगांवर ‘क्रूरपणे’ कारवाई; लघुउद्योग संघटनेचा आरोप!

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उद्योजकांना देशोधडीला लावले
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उद्योगांवर कारवाई होणार नसल्याचे सांगून गाफील ठेवले. मात्र, त्यानंतर कुदळवाडी, चिखली भागात क्रूरपणे कारवाई केली असून उद्योजकांना देशोधडीला लावले असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्याेग संघटनेने केला. दरम्यान, उद्योजकांना यंत्रसामग्री हटविण्यासाठी पुरेसा कालावधी दिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, सदस्य संजय सातव, नवनाथ वायाळ, विनोद मित्तल, भारत नरवडे, सुनील शिंदे, श्रीपती खुणे, बशीर तरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुदळवाडीत गेल्या पाच दिवसांपासून महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत १२०० लघु उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित उद्याेगांवरील कारवाई थांबवावी. त्यांना यंत्रसामग्री काढण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्यावी. उद्योजकांच्या मालकीच्या जागेवरील साहित्य हटविण्याची सक्ती करू नये, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
संदीप बेलसरे यांनी म्हटले आहे की, उद्योजकांना गाफील ठेवून महापालिकेने अमानुष व क्रूरपणे कारवाई करून उद्योजकांना देशोधडीला लावले आहे. या कारवाईमध्ये उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात शेड नुकसान जवळपास अंदाजे २६०० कोटी रुपये, मशिनरी व इतर साहित्य खर्च अंदाजे ३५०० कोटी रुपये, कच्चा व तयार झालेला माल जवळपास अंदाजे १५०० कोटी रुपये, या कारवाईत आजपर्यंत अंदाजे ७६०० कोटीचे नुकसान झाले असून ८०० उद्योजकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यापुढे ही कारवाई झाल्यास नुकसानीचा आकडा अंदाजे १५ हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे बेलसरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘८ जानेवारीपासून नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. विरोध झाल्यानंतर पुन्हा सात दिवसांची मुदत देण्यात आली. यंत्रसामग्री हटविण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे’ असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.