फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

बिश्नोई गँगकडून सलमानला नवी धमकी

बिश्नोई गँगकडून सलमानला नवी धमकी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई वाहतूक पोलिसांच्या वॉट्सअप नंबरवर बॉलिवुडचा अभिनेता सलमान खान याच्यासाठी आज पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बांद्रा येथे नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचा सुद्धा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासारखी सलमानची अवस्था होऊ द्यायची नसेल तर या पाच कोटी रुपयांच्या खंडणीचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेली वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून सलमान खानला वेगवेगळ्या प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची सोशल पोस्ट शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांचे सलमान खानशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

धमकी हलक्यात घेऊ नका
सलमान खान याला आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज आला असून यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेले बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला आहे. बाबा सिद्धिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था सलमान खानची होईल, असं म्हटलं आहे. मेसेजमध्ये पाच कोटींच्या खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारं वैर त्याला संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटींची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल”, असं या संदेशात लिहिल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या मेसेजची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. एएनआयनं यासंदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. पोलिसांनी या संदेशाबाबच तपासाला सुरुवात केली आहे.

का आहे बिश्नोई गँग आणि सलामनचं वैर
लॉरेन्स बिश्नोई व सलमान खान यांच्यातलं वैर आजचं नसून १९९८ पासूनचं आहे. १९९८ साली सलमान खाननं दोन काळवीटांची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळवीटांना पवित्र मानलं जातं. मात्र, त्यांच्या शिकारीमुळे समाजात असंतोष असल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. यामुळेच तेव्हापासून बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावरदेखील दोन अज्ञातांनी गोळीबार करून पळ काढला होता. आता पुन्हा एकदा बाबा सिद्दिकींची हत्या व सलमान खानला धमकी यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"