जातीय तणाव निर्माण करण्याचे विरोधकांकडून पाप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक संरक्षित करा; माजी खासदार अमर साबळे यांची मागणी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : परभणी येथील संविधान विटंबाची घटना निषेधार्थ असून पोलिस प्रशासनाने समाजामध्ये दरी निर्माण करणाऱ्या माथेफिरू यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे.
मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, प्रवक्ते तथा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, अमेय देशपांडे, दीपक भंडारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. जेव्हा-जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्रजी फडणवीस असतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचे पाप विरोधक करतात असा इतिहास आहे. महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व स्मारक संरक्षित करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे.
माजी खासदार अमर साबळे म्हणाले, ‘या देशाचा कारभार संविधानाने चालत आहे. संविधान हे देशाचे सर्वोच्च ग्रंथ आहे. अशा प्रकारची निष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. परंतु विरोधकांचा अजेंडा जातीय तणाव निर्माण करणे हा असल्यामुळे संविधानाच्या संदर्भात फेक नरेटीव्ह चालवणे हे त्यांचे षडयंत्र असल्यामुळे विरोधकांकडून तरुणांची माथी फिरवण्याचे काम सुरू आहे. संविधानाची विटंबना हे हीन कृत्य केल्यामुळे समाजामध्ये तेढ सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस असताना तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचे पाप विरोधक करतात असा पाठीमागील इतिहास आहे. एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनता त्या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्रात ताण तणाव निर्माण करण्याची विरोधकांची साजिश आहे. महाराष्ट्र शासनाने अशा माथेफिरू यांच्यावर कडक कारवाई करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या स्मारकाचे संरक्षण करावे, अशी विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.’