आंदेकर- कोमकर टोळी युद्धात गोळीबार!

एकजण गंभीर जखमी
पुणे : वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर पुण्यात सुरू झालेले आंदेकर- कोमकर टोळी युद्धात आज बुधवार 20 मे रोजी वनराज आंदेकर हत्येमधील आरोपीच्या भावाचा बालाजी नगर परिसरात आंदेकर टोळीच्या शूटर्सने गोळीबार करून गंभीर जखमी केले. आंदेकर टोळी चालवणारा बंडू आंदेकर त्याची मुलगी आणि सून हे सगळेजण सध्या तुरुंगात असताना आपल्या टोळीची सूत्रे हलवत नियोजनबद्धरीत्या हल्ला करण्यात आला.

पुण्यातील गणेश पेठ परिसरात बंडू आंदेकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची 2025 मध्ये कोमकर टोळीकडून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकार टोळीतील एक एकाला संपवायला सुरुवात केली आहे.
नराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आकाश मस्के याचा भाऊ अक्षय उर्फ बाळा मस्के (वय 26,स्वामी समर्थ मंदिराजवळ,सर्व्हे क्र. 25, आंबेगाव पठार, धनकवडी) या रिक्षा चालकावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भर दिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये अक्षय याच्या छातीवर दोन आणि कानाखाली एक अशा तीन गोळ्या त्याला लागल्या असून कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे .असे सांगण्यात येते की, गेल्या काही दिवसापासून अक्षय मस्के याच्यावर कोणीतरी पाळत ठेवत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला याबाबत सावध राहण्याचा इशारा देखील दिला होता. अक्षय म्हस्के यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याला जवळच असलेल्या भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
काही महिन्यापूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर कात्रज घुलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. हा देखील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बालाजी नगर परिसरात वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातील आरोपीच्या भावावर हल्ला करण्यात आला. बंडू आंदेकर हा तुरुंगात बसूनही सक्रिय असून आपल्या टोळीची सूत्रे हलवत असल्याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे. पोलीस सीसीटीव्ही द्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भर दिवसा हा हल्ल्या झाल्याने पुण्यातील टोळी युद्ध किती दिवस चालणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

