शक्ती कपूर अपहरणाच्या कटातून बचावले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बॉलिवुड अभिनेता मुश्ताक खान यांच्या अपहरणाचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर आणखी एका अभिनेत्याच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार अभिनेता शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा कट करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता मुश्ताक खान यांच्या अपहरण ज्या टोळीने केले होते, त्यांनीच प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा कट रचला होता. शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पाच लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. आणि कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांचे अपहरण करण्याचा या टोळीचा प्रयत्न होता. मात्र, शक्ती कपूर यांनी हा पाच लाख रुपयांचा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे हा अपहरणाचा कट फसला आहे.
यासंदर्भात बिजनौरचे पोलिस अधीक्षक अभिषेक झा यांनी सांगितले की, एका कार्यक्रमासाठी बोलावून अभिनेता शक्ती कपूर यांचे अपहरण करण्याचा एका टोळीचा बेत होता. आरोपींनी या कार्यक्रमासाठी शक्ती कपूर यांना पाच लाख रुपयांची ऑफर दिली होती. पण शक्ती कपूर यांनी ही रक्कम आगाऊ मागितल्यामुळे हा सगळा प्लॅन बारगळला. याच टोळीने मुश्ताक खाने यांचेही अपहरण केले होते. आता आणखीही काही अभिनेत्यांच्या अपहरणाचा यांचा प्लॅन होता का किंवा आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.
अभिनेता मुश्ताक यांच्या बाबतीत काय घडले होते?
मुश्ताक यांचे व्यवस्थापक शिवम यादव यांनी याप्रकरणी अपहरणाची तक्रार नऊ डिसेंबर रोजी केली होती. तेव्हा तक्रारीत नमूद केल्यानुसार, लवी उर्फ राहुल सैनी या व्यक्तीने १५ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमासाठी मेरठ येथे येण्याबाबत विचारले. त्यासाठी २५ हजार रुपये आगाऊ रक्कम आणि विमानाचे तिकीटही पाठवले. मुश्ताक दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना तेथून दिल्ली – मेरठ मार्गावर नेल्यानंतर दुसऱ्या गाडीत जबरदस्तीने बसवविण्यात आले. त्यावेळी गाडीत असलेल्या तिघा-चौघांनी मुश्ताक यांच्याकडे बँकेचे तपशील मागितले. त्यानंतर आरोपींनी तीन-चार वेळा मुश्ताक यांच्या खात्यातून तीन लाखाहून अधिक रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.