स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्ह्जकडे निघालेल्या प्रवासी बोट आणि नौदलाच्या स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्पीड बोटीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्ह्जकडे जाण्यासाठी प्रवासी बोटी रोज अनेक पर्यटकांना घेऊन समुद्रातून प्रवास करतात. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी नीलकमल नावाची प्रवासी बोट शंभरहून अधिक प्रवाशांना घेऊन केव्ह्जच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती. मात्र, अचानक त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे ती बोट मोठ्या प्रवासी बोटीला धडकली. प्रवासी बोट लाकडाची होती त्यामुळे जबर धडकेने बोटीला भगदाड पडले, ती कलंडली आणि समुद्राचे पाणी बोटीत शिरल्याने ती बुडाली. या दुर्घटनेनंतर स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा – मुंबई बोट अपघातातील मृतांचा आकडा १३ https://tothepoints.org/boat-bound-for-elephanta-sinks-after-collision-with-speed-boat-14-passengers-died/
दुपारी पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघातात बचावलेले नाथाराम चौधरी (वय २२) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बोटींवर मिळून प्रवासी आणि कर्मचारी असे ११५ जणांना बचाव कार्यात वाचविण्यात आले आहे. त्यापैकी ९७ जणांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दुर्घटनेतील जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात १, सेंट जॉर्जमध्ये ९, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे. नीलकमल बोटीवरील ५ कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती आहे. बेपत्ता प्रवाशांचा अजूनही शोध सुरू आहे.