“उपमुख्यमंत्री म्हणून मी जनतेची माफी मागतो“

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
लातूर : महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासमान आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक आहे. अधिकारी असोत वा कंत्राटदार, दोषींविरोधात कारवाई केली जाईल
, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान लातूरमध्ये आयोजित एका सार्वजनिक बैठकीत ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना हल्लाबोल केला आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य करत राज्याच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, कनिष्ठ अधिकारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
गेल्या वर्षी ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. त्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर होते. अनावरणानंतर अवघ्या ८ महिन्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी कंत्राटदारावर एफआयआर दाखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं. लहान लहान भाग जोडून पुतळा उभारण्यात आला. ते भाग जोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट, बोल्टला गंज आलेला होता, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं यावरुन शिंदे सरकारवर टिकेची झोड उठवली. महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडीनं सरकारला लक्ष्य केलं. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं मूर्ती कोसळली, असा दावा करणं म्हणजे बेशरमपणाची हद्द गाठण्यासारखं असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.