राज्य विधिमंडळाच्या कामकाज आणि प्रश्न विचारण्याचे प्रमाणही घटले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत १२व्या विधानसभेच्या तुलनेत कामकाजाच्या दिवसांत ४३ टक्के, तर प्रश्न विचारण्याच्या प्रमाणात ७३ टक्के इतकी गंभीर घट झाली आहे.प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
विद्यमान १४व्या विधानसभेच्या कामकाजाविषयी ही बाब नमूद करताना संस्थेने राज्यातील ढवळून निघालेले वातावरण, प्रमुख पक्षांमधील फुटी आणि बदलती राज्य सरकारे यां चा उल्लेख केला आहे. याचा प्रतिकूल परिणाम विधिमंडळातील कामकाजावर झाल्याचे निरीक्षण संस्थेचे सीईओ मिलिंद म्हस्के, सहायक व्यवस्थापक एकनाथ पवार आणि नीलम मिराशी यांनी मांडले.
बाराव्या विधानसभेत २१० दिवस, तेराव्या विधानसभेत २०६ दिवस, तर विद्यमान चौदाव्या विधानसभेत ११९ दिवस कामकाज झाले. बाराव्या विधानसभेच्या तुलनेत तेराव्या विधानसभेच्या कामकाजाच्या दिवसांत दोन टक्के, तर चौदाव्या विधानसभेच्या कामकाजात ( हिवाळी सत्र २०१९ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ ) ४३ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे तीनही कालावधींत आमदारांच्या उपस्थितीचे एकूण प्रमाण ८८ टक्के, ८९ टक्के आणि ८९ टक्के इतके स्थिर राहिले आहे. पुढचा गंभीर मुद्दा म्हणजे आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा बाराव्या विधानसभेत ४० हजार ५१२, तेराव्या विधानसभेत २२ हजार ४०४ , तर चालू विधानसभेत ११ हजार १३२ इतके प्रश्न (७३ टक्के घट) आमदारांनी विचारले.