महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

पिंपरी, प्रतिनिधी : मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंद नगर, साईबाबा नगर, गवळीवाडा, इंदिरानगर, काळभोर नगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर, परशुराम नगर या परिसरातील महावितरणचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरणच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना विजेची समस्या येत असल्याने परिसरातील नागरिकांनी नागरी हक्क कृती समितीच्या माध्यमातून मंगळवारी थेट महावितरणच्या थरमॅक्स चौकातील कार्यालयावर मोर्चा काढला.
महावितरणचे मुख्य अभियंता अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले. नागरिकांच्या मागण्यांबाबत महावितरण कडून लेखी आश्वासन देण्यात आले. मोर्चामध्ये सामाजिक, राजकीय, व्यापार, लघुउद्योजक, हातगाडी पथारी टपरी धारक मोठ्या संख्येने सहभागी होते.
संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी दहा वाजता श्री दत्त मंदिर चौक मोहननगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. हा मोर्चा मोहननगर-महात्मा फुले नगर-दत्तनगर-विद्यानगर-शंकरनगर-रामनगर-परशुराम नगर मार्गे महावितरणच्या थरमॅक्स चौकातील आकुर्डी विभागीय कार्यालयात धडकला.
विजेच्या लपंडावामुळे मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंद नगर, साईबाबा नगर, गवळीवाडा, इंदिरानगर, काळभोर नगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर, परशुराम नगर या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच परिसरातील अनेक नागरिकांना डेंग्यू, चिकनगुनियाची लागण होऊन ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
वीज पुरवठा सुरळीत नसल्याने सतत अंधार असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत. या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. महावितरणच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळेच अनेक नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे यासाठी अनेकांनी महावितरणला वेगवेगळी निवेदने यापूर्वी दिली होती. मात्र यावर कायमस्वरूपी कुठलाही उपाय निघाला नाही.