सलमान खानच्या हत्येसाठी २० लाखाची सुपारी!

प्रतिनिधी, मुंबई : अभिनेता सलमान खान मुंबईत वांद्रे येथे रहात असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने सहा आरोपींना वीस लाख दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेने तयार केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानची हत्या करण्यासाठी सहा आरोपींना २० लाखांची सुपारी दिली होती.
सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने अनमोल बिश्नोई आणि रोहित गोदारा या गँगस्टरविरोधात अलीकडेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, यानंतर सलमान खानच्या हत्येसाठी दिलेल्या कंत्राटाबद्दलची ताजी माहिती समोर आली आहे. या खटल्याशी संबंधित आरोपपत्रात नावे आल्यानंतर अनमोल आणि रोहित दोघेही फरार आहेत. २७ जुलै २०२४ रोजी विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी त्यांच्या अटकेसाठी स्थायी अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
कधी झाला होता गॅलॅक्सी
वर गोळीबार?
बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार झाला होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केलेला. त्यावेळी अभिनेता आणि त्याचे कुटुंब घरी उपस्थित होते, मात्र कोणालाही इजा झाली नव्हती. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्यांसह काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवीन माहिती समजते आहे. सलमानसह त्याच्या कुटुंबीयांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. नुकतेच असे समोर आले की, लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्यासाठी ६ आरोपींनी २० लाख रुपयेही दिले होते.या प्रकारानंतर गँगस्टरचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
पैशांसाठी भाईजानच्या घरावर हल्ला?
गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी २४ वर्षीय आरोपी विकी गुप्ता बाइक चालवत होता, तर त्याचा साथीदार सागर पालने (३५) गोळीबार केला. आरोपपत्रानुसार, विकीने कबुली दिलेली की त्याने कुटुंबाच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे हे कृत्य केले होते. त्याने दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, ‘मला वाटले की पोलीस मला पकडू शकत नाहीत, मात्र तरीही मला अटक झाली’.