प्रवासी वाहनांचा लेट पासिंग दंड रद्द करण्याची घोषणा

पिंपरी, प्रतिनिधी : रिक्षा, टॅक्सीसह इतर वाहनांना लेट पासिंगबाबत दर दिवशी लावण्यात येणारा ५० रुपयांच्या दंडाचा जुलमी कायदा अखेर रद्द करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक, मालक यांनी सुरू ठेवलेल्या लढाईला यश आले असल्याचे प्रतिपादन ऑटो, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो, बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. तसेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कांबळे यांनी स्वागतही केले आहे.
लेट पासिंग बाबत केंद्र सरकारने जुलमी कायदा राबविला आहे. दर दिवशी रिक्षा व इतर वाहनांना ५० रुपयांची दंडाची तरतूद करण्यात आली होती. या मुळे अनेकांना लाखो रुपयांचा दंड भरण्याची नामुष्की ओढवणार होती. एवढे पैसे भरणे रिक्षा चालकांना जमणार नव्हते. या निर्णयाविरोधात पुणे, पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकजुटीने लढा दिला. त्याला यश आले आहे.
दरम्यानच्या काळात बाबा कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. शासनाने हा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे. आता पुढील कागदोपत्री कार्यवाही त्वरित करणे गरजेचे आहे अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.
या लढ्यामध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो, टॅक्सी चालक-मालक संघटना, संयुक्त कृती समिती, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन व सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनामध्ये फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष जाफर नदाफ, आनंद तांबे, नरेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर हुमणे, वैजनाथ देशमुख, शिवाजी गोरे, बबलू आतिश खान, इलाज लोणी खान, किशोर चिंतामणी, अंकुश नवले, शुभम तांदळे, बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, मोहम्मद शेख, विलास कमसे पाटील यांनी भाग घेतला होता.