नवी दिल्ली, प्रतिनिधी : १८ व्या लोकसभा सभापतींच्या निवडीनंतर लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. सभापती ओम बिर्ला यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षतेखालील १८ व्या लोकसभेची खूप मोठी भूमिका असेल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
अमृतकाळाच्या या महत्त्वपूर्ण काळात दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्याला लाभली आहे आणि आपला पाच वर्षांचा अनुभव आणि आपल्यासोबत आमचाही पाच वर्षांचा अनुभव, आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आपण येणारी पाच वर्षे आम्हा सर्वांना मार्गदर्शनही कराल आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची या सदनाची जी जबाबदारी आहे ती निभावण्यात तुमची मोठी भूमिका असेल.
तुमचा मागील कार्यकाळ, १७ व्या लोकसभेचा कालखंड संसदीय इतिहासातील सुवर्णकाळ राहिला आहे. आपल्या अध्यक्षतेखाली संसदेमध्ये जे ऐतिहासिक निर्णय झाले, आपल्या अध्यक्षतेत सदनाच्या माध्यमातून ज्या सुधारणा झाल्या ती या सदनाची आणि आपली मोठी ठेव आहे आणि भविष्यामध्ये १७ व्या लोकसभेचे जे सिंहावलोकन होईल, तिच्याविषयी जेव्हा लिहिले जाईल तेव्हा भारताच्या भविष्याला नवी दिशा देण्यात आपल्या अध्यक्षतेखालील १८ व्या लोकसभेची खूप मोठी भूमिका असेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी -20 हा भारताच्या यशातील महत्वपूर्ण पान आहे. पण आपल्या नेतृत्वाखाली जी-20 देशांच्या पीठासीन अधिकारी आणि वक्त्यांची जी, P-20 परिषद झाली, त्याविषयी फारच कमी चर्चा झाली आहे,आणि ही P-20 आतापर्यंत झालेल्या सर्व परिषदांमध्ये अशी एक वैशिष्ट्यपूर्ण परिषद होती ज्यात तुमच्या निमंत्रणावरून जगातील बहुतेक देश भारतात आले आणि त्या शिखर परिषदेत खूप उत्तम निर्णय घेण्यात आले; भारताच्या लोकशाहीचा जगात गौरव करण्यात यांचा फार मोठा वाटा आहे.
आम्हा सर्वांना सभागृहात आदर्श आचरण करायचे आहे, आम्हा सर्वांना सभागृहाचे नियम पाळायचे आहेत आणि यासाठी आपण अत्यंत काटेकोरपणे, सुयोग्य पद्धतीने आणि कधी कधी कठोरपणे निर्णय घेतले आहेत.मला माहित आहे, की अशा निर्णयांमुळे आपल्याला त्रास होतो. परंतु वैयक्तिक वेदना आणि सदनाच्या प्रतिष्ठेच्या वेळी तुम्ही सभागृहाची प्रतिष्ठा याची निवड करता आणि सदनाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करता, या धैर्यशाली कार्यासाठी आदरणीय अध्यक्ष महोदय, आपण अभिनंदनास पात्र आहात.मला खात्री आहे की आदरणीय अध्यक्ष, आपण यशस्वी व्हालच.तसेच तुमच्या अध्यक्षतेखाली ही 18वी लोकसभा देशातील नागरिकांची स्वप्नेही यशस्वीपणे पूर्ण करेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.