नवी दिल्ली – देशाच्या अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने त्याचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. मोदी आणि गांधींनी अध्यक्षपदांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने बिर्ला अध्यक्षपदावर आसनस्थ झाले. बिर्ला यांचा सतराव्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. इंडिया आघाडीच्या वतीने के.सुरेश यांनी अर्ज केला होता. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे उपाध्यक्षसुद्धा आता एनडीएचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. ती पूर्ण होणार नाही, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.


