पाऊले तुकोबांची पुस्तकाचे प्रकाशन

पिंपरी, प्रतिनिधी : वारकरी संप्रदायातील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी वैश्विक विचार, विश्व बंधुत्व विचार आपणास दिला आहे. त्याचे विचार प्रेरणादायी आहेत. आजची तरुणाई वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध झाली आहे, त्या तरुणाईच्या वैचारिक समृद्धतेतेसाठी तुकाबांचे विचार आणि पाऊले तुकोबांची पुस्तक प्रेरणादायी आहे, असे मत माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
संत आणि लोक साहित्याचे अभ्यासक आणि लोकमतचे मुख्य उप संपादक डॉ विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, ‘महाराष्ट्र ही संतभूमी आहे. वारकरी संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराज तर कळस संत तुकाराम महाराज ठरले आहे. वारकरी संतांच्या साहित्याने आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम केलं आहे. तुकोबांची गाथा ही जगणे समृद्ध करणारी आहे. मानवी जीवनाचं प्रतिबिंब अभंगांमध्ये उमटले आहे. जगण्यातील वास्तववादी दर्शन घडवणारी आहे.
संपादक संजय आवटे यांनी प्रास्ताविक म्हणाले, ‘ वारकरी संतांची भव्य आणि दिव्य अशी परंपरा महाराष्ट्राला लाभले आहे. त्यातील वारीने माणसांचे जीवन समृद्ध केले आहे. जगणे समृद्ध करणारी वारी आहे. विश्वात्मक विचार संश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दिला. त्यावरील लोकमधील लेखांचे पुस्तक आज प्रकशित होत आहे.’
डॉ विश्वास मोरे म्हणाले, संत तुकाराम महारांजांचे अभंग समाजासाठी प्रेरक आहेत. गेली साडेतीनशे वर्ष या अभंगाचे प्रतिबिंब समाजात उमटले आहे. महात्मा गांधींपासून तर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत, राष्ट्रपती, साहित्यिक आणि विचारवंत, ज्ञानपीठावर तुकोबारायांच्या अभंगांचा प्रभाव आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या चिंतनस्थानी तुकोबाराय होते. नाटक, चित्रपट, नृत्य, चित्र, शिल्प केलेत, साहित्यात अभांगाचे प्रतिबिंब उमटले आहे. देश, भाषा, प्रांतांच्या सीमा ओलांडून तुकोबारायांचे काव्य जनमनात रुजले आहे. सातासमुद्रापारही त्याचे तरंग उमटले आहेत. अर्थात त्याचे विश्व बंधूत्वाचे विचार जगण्याला दिशा देतात. जगणे समृद्द करतात.’