सनातन धर्माचा अनादर खपवून घेणार नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डागली विरोधकांवर तोफ
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
लखनौ (वृत्तसंस्था) : महाकुंभबाबतच्या खोट्या कथा रचून किंवा अफवा पसरवून सनातन धर्माचा अनादर करण्याच्या वृत्तीला खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांनी हा खोटा प्रचार थांबवावा, अशा कठोर शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर तोफ डागली.
उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, महाकुंभमेळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. या घटनेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप त्यांनी यावेळी विरोधकांवर केला. ते म्हणाले की, “सनातन धर्म हा भारताचा आत्मा आहे आणि त्याची प्रतिष्ठा राखणे आपले कर्तव्य आहे. खोट्या कथनांनी महाकुंभाला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. महाकुंभ हा भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. आणि या परंपरेबाबत विरोधी पक्ष देशवासियांची दिशाभूल करीत आहेत. आमचे सरकार हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि भव्य करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या टीकात्मक विधानांचा संदर्भ देत, विरोधकांनी निराधार आरोप करून पवित्र कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. विरोधी पक्ष सातत्याने महाकुंभाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकडे दुर्लक्ष करून त्याच्या विरोधात सतत “खोटा प्रचार” करीत आहे.