आनंदवनला १० कोटींचा निधी: मुख्यमंत्री फडणवीस!

चंद्रपूर : २०१२ पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रती रुग्ण २२०० रुपयांऐवजी आता सहा हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रती रुग्ण दोन हजार वरून सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये निधी लगेच देण्यात येईल. उर्वरित ६५ कोटी रुपये निधी देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. या संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.