ईव्हीएम हॅक करता येतं : महादेव जानकर

मुंबई, प्रतिनिधी : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तसेच अनेक दिग्गज नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता मविआच्या नेत्यांकडून वारंवार ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्यामागील कारण देखील सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जानकर म्हणाले की, ईव्हीएमवर माझा आक्षेप असून देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहे. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे, ईव्हीएम हॅक करता यते. मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर महायुतीमधून बाहेर का पडलो याबाबत बोलतांना ते म्हणाले की, “मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे, त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही, त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. तसेच माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू, असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला.