तिबेटमध्ये भूकंप; ५३ जणांचा मृत्यू

नेपाळपासून भारताच्या सीमा देखील हादरल्या
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
ल्हासा (पीटीआय) : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात आज (मंगळवारी) सकाळी सातच्या सुमारास तासाभरात सलग सहा भूकंप झाले. ७.१ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. याचे धक्के भारत आणि बांग्लादेशच्या अनेक भागात जाणवले आहेत. सध्या मृतांचा आकडा ५३ इतका आहे. तरत ३८ लोक जखमी झाले आहेत.
भूकंपाचे केंद्र तिबेटमध्ये आहे. मात्र, हे ठिकाण नेपाळच्या सीमेला लागून असल्यामुळे नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपाल चौक, कावरे, मकवानपूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंप जाणवला मात्र, भारताच्या सीमेवरील गावांमध्ये कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही. काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढम्याची शक्यता आहे. तिबेटमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. अनेक घरांमध्ये, ढिगाऱ्याखाली लोक अडकून पडले आहेत. चिनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, या भूकंपाचं केंद्र २८.५ डिग्री उत्तर अक्षांश आणि ८७.४५ डिग्री पूर्व येथे होतं. जमिनीपासून १० किलोमीटर खोलवर भूकंपाचं केंद्र होतं.